- Special FeaturesFoundation Year1400Sthala TreeTheerthamRathamArchitectureOther Speciality
- Sthala Puran
- Architecture
- Alankar of Deity
जामसंडेची ग्रामदैवत श्री. देवी दिर्बादेवी. ( DIRBA DEVI)
अवघे कोकण देवभूमी असल्याने येथील प्रत्येक गावात रहाटीची मंदिरे आणि ग्रामदैवते यांना जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अर्थात तेथील रितीरिवाज, संस्कृती व धार्मिक परंपरा यांच्याशी या सर्व दैवतांचा एका अभिनव नात्याचा भावनिक संबंध आहे. त्यामुळे त्यांचे मार्ग जेथून जातात, त्या मार्गाचे पावित्र्य जपण्याची परंपरा आजही पाळली जाते. म्हणूनच या भूमीला ‘श्रद्धाळू भूमी’, असेही म्हटले जाते.
देवगडपासून २ कि. मी. अंतरावर तर मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगावपासून सुमारे ३६ कि. मी. वर रस्त्यालगत हे प्रशस्त मंदिर आहे. देवगड ,सिंधुदुर्ग येथील जामसंडे गावचे आराध्य दैवत श्री. देवी दिर्बाईची किर्ती सर्वदूर पसरली आहे. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी श्री. दिर्बाई माऊली हिच्या दर्शनासाठी दररोज भक्तगणांची गर्दी असते.
मच्छीमारही ( गाबित ) तिची अनुमती घेतल्याशिवाय समुद्रात जात नाही. या पंचक्रोशीतील ग्रामदेवतेचे महत्त्व एका वाक्यात सांगावयाचे झाल्यास नवसाला पावणारी, संकटसमयी हाकेला धावणारी अशी सर्वांची श्री. दिर्बाई माऊली, तिच्याविषयी थोडेसे.
नारळी पौर्णिमा झाल्यानंतर सारे मच्छीमार ( गाबित ) बांधीव नौका सागरात लोटण्यासाठी सज्ज होतात. सागराला श्रीफळ अर्पण करून ग्रामदेवता दिर्बादेवीची अनुमती घेऊन तिलाही श्रीफळ अर्पण करतात. कुणी खणानारळाची ओटी भरतात तर कुणी साडी चोळी नेसवितात. तिच्या कृपाशिर्वादानेच खोल समुद्रात व्यवसायास सुरूवात होते. संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व प्रथम ते दिर्बाईलाच हाक मारतात. या मच्छीमार ( गाबित ) बांधवांच्या श्रद्धास्थाना बरोबरच जगभरात पोहोचलेला येथील हापूस आंब्याचा ट्रान्सपोर्ट कंपनीचा प्रत्येक ट्रक दिर्बादेवीचा आशिर्वाद घेऊन श्रीफळ वाढवून मगच मुंबई, पुणे, बेळगांव, कोल्हापूरकडे रवाना होतो. दैनंदिन सहली, खाजगी वाहनातून आलेली लग्नाची व-हाडी मंडळीही देवीचा आशिर्वाद घेतात. त्याप्रसंगी सर्वांचे हात जोडले जातात असे हे पंचक्रोशीत ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणून परिचित आहे.
जामसंडे गांवचेदिर्बादेवी मंदिर सुमारे दोन एकर जागेत सामावलेले असून मंदिराभोवती रामेश्वर, आदिनाथ, गणपती, नारायण, भावकादेवी इत्यादी मंदिरे, मुख्य मंदिरात दिर्बादेवी विराजमान झालेली दिसते. कानात मकर कुंडल, मागे प्रभावळ, उजव्या हातात खडग, डाव्या हातात अमृतपात्र, जुन्या काळातील सुमारे दोन फुट उंचीची काळ्या पाषाणाची द्विभूजा मूर्ती या मंदिरात साकारलेली आहे.
मंदिराला उंच कळस बसविला असून फरशी, मार्बल टाईल्सचा सुरेख वापर सुशोभिकरण पहावयास मिळते. मंदिराच्या आसपास पूर्वीपासून भग्न मूर्ती दृष्टीस पडतात. यासंदर्भातआख्यायिकासांगितल्या जातात. इतिहासकालीन मूर्तीभंजकांच्या तावडीतून अनेक मंदिरे भग्न झाली. तसाच या मंदिरावर हल्ला झाला असावा असे वाटते. या मूर्तींची भंजकांच्या तावडीतून सुटका व्हावी. त्याचबरोबर देवीचे संरक्षण व्हावे यासाठी भक्तांनी देवीची मूर्ती देवगडच्या समुद्रात लपविली. हा काळ सुमारे ७०० वप्षापूर्वीचा असावा
समुद्रात लपविलेली ही मूर्ती प्रभू नावाच्या मच्छीमारांना ( गाबित ) सापडली. त्यांनी ती मूर्ती आध्यात्मिक भावनेने मुंबरी येथील मामांकडे ठेवली. नंतर त्यांना झालेल्या दृष्टांतावरून तिची जामसंडे येथील मूळ माळावर मंदिरात स्थापना झाली. यामुळे मच्छीमार ( गाबित ) बांधवांना ती आपली वाटते. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. ती भटवाडीतील भिडे माहेरवाशीणीने बांधली आहे. आवारात पाय-यांची विहीर आहे. चार दीपमाळा आहेत. वीरांची स्मारके अर्थातच वीरगळ ही मंदिराच्या आवारात आहे.
त्रिपुरी पौर्णिमे दिवशी मंदिर दिव्यांच्या लखलखाटाने उजळून निघते. नवसाला पावणा-या देवीच्या दर्शनाला तसेच बोललेले नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होते. देवी दिर्बाई महाशिवरात्रीला कुणकेश्वर भेटीला जाते, तेव्हा ती तारामुंबरी येथे विसावते. ते तिचे माहेरघर असून साडी चोळी नेसवून तिचे स्वागत याठिकाणी केले जाते.
तसेच आच-याचा रामेश्वर हा तिचा भाऊ असून त्या देवस्थानाकडूनही देवीला साडी चोळी येते. तर दिर्बादेवीकडून रामेश्वरासाठी धोतर जोडी जाते. तसेच देवगड किल्ला येथील गणपती हाही या देवीचा भाऊ असून दिर्बाई गणपती भेटीला जाते.
काळाच्या मानाच्या परिणामांमुळे पाषाणांवर, मूर्तींवर परिणाम होऊन मूर्तींची झीज झाली, त्यासाठी वज्रलेप करून भक्तगणांनी वज्रलेप सोहळा केला.कार्तिक शुद्ध पौर्णिमा अर्थातच त्रिपुरारी पौर्णिमेला जामसंडे वासियांचे ग्रामदैवत माता दिर्बादेवीचा जत्रोत्सव साजरा होतो. देवगड - निपाणी महामार्गावरील जामसंडे येथील नवसाला पावणा-या श्री. देवी दिर्बादेवी व श्री. देव रामेश्वर अशा ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी जत्रोत्सवाबरोबरच दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक पाहुणे उपस्थित असतात.
- परिक्षित प्रकाश (बाबू) राऊत .
कावलेवाडी, जामसंडे-देवगड ,सिंधुदुर्ग.
मोबाईल क्र. ९५९४ ८४ ५०५५
- Prayers and BenefitsSpecial Vratas and Prayers
सभोवतालचा संपूर्ण परिसर हा कातळीभाग असून त्यावर थोडीफार शेती व बहुतांश भागात हापूस आंबा लागवड केलेली आढळते. श्री दिर्बादेवी ही जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत असून मंदिराच्या आवारात रामेश्वर, नारायण, गणपती, पावणाई, हनुमान व ब्राह्मणदेव ही मंदिरे आहेत.
मंदिराभोवती चिरेबंदी तटबंदी असून एक पाय-यांची विहीर, समोर चार दीपमाळ व वीरांची स्मारके मंदिराच्या आवारात आहेत. तर कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरात प्रवेशद्वाराशी आहे.
मंदिर सुमारे ३०० वर्षे पुरातन असावे. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, ती या देवीची मूर्ती तारामुंबरीतील ढवळे प्रभू यांना समुद्रात मिळाली ती त्यांनी आपल्या मामांकडे ठेवली. नंतर त्यांना झालेल्या दृष्टांतावरून तिची जामसंडे येथील माळावर मंदिरात स्थापना झाली. त्यामुळे मच्छीमार बांधवांना ती आपली वाटते.
सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची सुबक मूर्ती असून देवीच्या एका हातात खड्ग व डाव्या हातात अमृतपात्र आहे. रोज स्नान झाल्यावर मूर्तीची वस्रलंकारांनी सजावट केली जाते. नंतर पूजा-अर्चा पार पडते. नवसाला पावणारी व हाकेला धावून जाणारी म्हणून दिर्बाईची ख्याती सर्वदूर असल्याने मंदिरात रोज भाविकांची वर्दळ असते. येथील ग्रामस्थांमध्ये कोणत्याही कामाचा सुभारंभ करण्यापूर्वी देवीचा कौल घेण्याची प्रथा आहे.
नारळीपौर्णिमा झाल्यावर सारे मच्छीमार बांधव सागराला श्रीफळ अर्पण करून आपल्या नौका सागरात सोडतात, त्याचप्रमाणे देवीलाही श्रीफळ अर्पण करून तिची अनुमती घेतात. या मार्गाने जाणारे खासगी प्रवासी बसवाले, सहली घेऊन जाणारे, लग्नाची वऱ्हाडे तसेच आंबा वाहतूकदार आपली वाहने थांबवून श्रीफळ अर्पण करूनच पुढच्या प्रवासाला निघतात ते देवीचे आशीर्वाद घेऊनच.
दिर्बादेवी हे गोडे दैवत मानले जाते. तिला केळ्याचा प्रसाद दाखवतात. दिर्बादेवीचे कामते येथील भगवती व साळशी येथील पावणाई देवीशी संबंध असून, दिर्बादेवी आच-याचा रामेश्वर, इळयेचा लिंगेश्वर व कुणकेश्वराची मोठी बहीण मानली जाते. त्यामुळे सर्व देव तिच्या भेटीस येतात. ती कुणकेश्वराला जात नाही, तर कुणकेश्वरच तिच्या भेटीला येतो. नंतर देवीचे तरंग कुणकेश्वरला जातात.
येतेवेळी वाटेत मुंबरीतील चौगचार स्थळाकडे देवी माहेरवाशीण म्हणून जाते. तेथे तिची खणा-नारळाने व साडीने ओटी भरली जाते. सर्व भाविकांना यावेळी मांसाहारी भोजन दिले जाते. खाडीतून पलीकडे जाताना गावातील सर्व होडय़ा जोडून पूल तयार केला जातो. तेथून पलीकडे मीठमुंबरी मार्गे कुणकेश्वरला देवीचे तरंग जातात.
देवीच्या बारापाचाच्या मानक-यांमध्ये कावले, मिराशी, भडसाळे, कुलकर्णी, घोणे, घाडीगावकर आदी मानकरी असून घाडी हे सध्या पुजारी आहेत. मंदिरात दर तीन वर्षानी गोंधळ होतो. देवगड किल्ल्यावरील गणपती मंदिरास देवी भेट द्यायला जाते त्यावेळची मिरवणूक अगदी नेत्रदीपक असते. संपूर्ण रस्ता विद्युत रोषणाई, रांगोळ्यांनी सजवलेला असतो. संपूर्ण जामसंडे-देवगड व आजूबाजूच्या भाविकांची प्रचंड रिघ लागलेली त्यावेळी पाहायला मिळते.
श्रावणात अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव व त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत महिनाभर रामेश्वराची पालखी सोहळा संपन्न होतो. त्रिपुरी पौर्णिमेला मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघते. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी आदींनी ढोल-ताशांच्या गजरात मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी असते.
दिवसभर जत्रा असल्याने आबालवृद्धांची चंगळच असते. विविध वस्तू, कपडे, खेळणी, संसारोपयोगी वस्तू व खाद्य पदार्थाची दुकाने गर्दीने भरलेली दिसतात. भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने आनंद ओसंडून वाहताना दिसतो. ग्रामीण भाषेत याला ‘टिपर’ असे म्हणतात.
फाल्गुन महिन्यात येथे बारा वाडयांची प्रचंड मोठी होळी मंदिराबाहेर उभी केली जाते. ती पाहणेही मोठे रंजक असते. अशाप्रकारे दिर्बादेवीची वार्षिके मोठय़ा आनंदात साजरी केली जातात. त्यामुळे देवगडला येणारा भाविक पर्यटक देवीचे दर्शन घेऊनच कुणकेश्वरला जातो.
- परिक्षित प्रकाश (बाबू) राऊत .
कावलेवाडी, जामसंडे-देवगड ,सिंधुदुर्ग.
मोबाईल क्र. ९५९४ ८४ ५०५५
Offerings to DeityStotras and Mantras
- Festivals
- Sodasha Upcharas
- Prasadhas
- Social ActivitiesAnnadhanMarriageEar BoringHead ShaveDanaasEducation FacilitiesSocial DrivesOther Activities
- Arjita Seva
- Tags